
रत्नागिरी, 18 मे (हिं.स.) । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित ही स्पर्धा दसऱ्यापासून सुरू झाली असून ३१ मेपर्यंत चालणार आहे.
गेल्या वर्षी स्पर्धेत ४७ नाटके सादर झाली होती. यंदा हा आकडा ५३ वर पोहोचला असून तो साठच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील विविध नाटके या स्पर्धेत सादर होत आहेत. नवोदित लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि तंत्रज्ञांना या स्पर्धेमुळे मोठे व्यासपीठ मिळाले आहे.
गावागावांतील उत्सवी नाट्यपरंपरेला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. थंडीपासून उन्हाळ्यापर्यंत खुल्या प्रांगणात होणाऱ्या प्रयोगांना रसिकांची मोठी गर्दी होत आहे. कार्तिकी उत्सव, दत्तजयंती, होळी, माघी गणेशोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती आदी उत्सवांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांचा या स्पर्धेत समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी