
मुंबई, 29 मे (हिं.स.) - सुमारे १३९ वर्षे जुन्या मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही भारतातील संघटित क्षेत्रातील पहिली सोन्याचे पुनर्वापर करणारी कंपनी आहे, जिने आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अखेरपर्यंत आपल्या 'मुथूट गोल्ड पॉईंट'च्या जाळ्याचे विस्तार करून केंद्रांची संख्या २०० पर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे.
हा विस्तार देशातील संघटित सोन्याच्या पुनर्वापराचा वाढता कल दर्शवतो. सोन्याची आयात कमी करणे, देशांतर्गत स्तरावर सोन्याचे वितरण मजबूत करणे आणि भारताच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीला नवी गती देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वाकांक्षी विस्ताराविषयी बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की, मुथूट गोल्ड पॉईंटच्या माध्यमातून आम्ही संघटित सोन्याचे पुनर्वापर करण्यातील संधी खूप आधीच ओळखल्या होत्या. आम्ही संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी एक पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रणाली तयार करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. माननीय पंतप्रधानांनी सोन्याची आयात कमी करण्यावर आणि देशांतर्गत सोन्याचे वितरण मजबूत करण्यावर जो भर दिला आहे, त्यानुसार आमचा ठाम विश्वास आहे की, संघटित सोन्याचे पुनर्वापर केवळ भारताच्या विकास गाथेला आधार देणार नाही, तर शाश्वत आणि ईएसजी (ESG) अनुकूल पद्धतींना देखील बळकट करेल.
त्यांनी पुढे सांगितले की, आज मुथूट एक्झिम संपूर्ण देशात १०९ मुथूट गोल्ड पॉईंट सेंटर्सचे संचालन करते. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ५५,००० हून अधिक ग्राहकांकडून आलेल्या सुमारे ५ टन जुन्या सोन्याचे यशस्वी पुनर्वापर करण्यात आले आहे. कंपनीची पारदर्शकता आणि वैज्ञानिक मूल्यमापन पद्धतींमुळे सुमारे ४० टक्के ग्राहक पुन्हा आमच्याकडे व्यवहारासाठी परत आले आहेत. याच यशाचा आलेख पाहता कंपनी आता आपली वार्षिक सोन्याची पुनर्वापर क्षमता वाढवण्यासाठी केंद्रांची संख्या २०० पर्यंत नेण्यावर काम करत आहे.
मुथूट गोल्ड पॉईंट सोन्याची वैज्ञानिक तपासणी आणि पूर्णपणे पारदर्शक मूल्यमापन प्रक्रिया प्रदान करते, ज्याचा मुख्य हेतू भारतातील असंघटित सोन्याच्या पुनर्वापर बाजारपेठेला एक संघटित आणि विश्वासार्ह स्वरूप देणे हा आहे.
कंपनी या विशेष केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांकडून थेट जुने आणि न वापरलेले सोने खरेदी करते; त्यानंतर अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे ते शुद्ध करून २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या रूपात देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा सादर केले जाते. या शुद्ध सोन्याचा वापर नवीन नाणी आणि दागिने बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे पाऊल केवळ सोन्याच्या नवीन खाणकामावरील अवलंबित्व कमी करत नाही, तर भारतीय सुवर्ण बाजारात सोन्याच्या योग्य वापराला चालना देते आणि शाश्वत पुरवठा साखळी मजबूत करते.
मुथूट गोल्ड पॉइंट सेंटर्स ग्राहकांचा आपल्यावर असलेला विश्वास आणि आपल्या पारदर्शकतेच्या कटिबद्धतेसाठी सर्वत्र ओळखले जातात; ज्यामुळे ग्राहकांना सोन्याच्या मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येते आणि त्यांना त्यांच्या सोन्याचा योग्य व अचूक मोबदला मिळतो. १०,००० रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी त्वरित रोख भरणा केला जातो, मात्र त्यापेक्षा जास्त रकमेसाठी आयएमपीएस, एनईएफटी किंवा आरटीजीएस द्वारे प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे एक सुरळीत आणि विश्वासार्ह व्यवहाराचा अनुभव ग्राहकांना मिळतो.
सध्या ग्राहकांचा दृष्टिकोनही हळूहळू बदलत चालला आहे; आजचा भारत सोन्याला तिजोरीत बंद करून ठेवणारी एक निष्क्रिय संपत्ती न मानता, एक सक्रिय वित्तीय मालमत्ता म्हणून पाहत आहे. आपल्या घरातील सोन्याचा एक छोटासा भाग जरी देशाच्या मुख्य अर्थव्यवस्थेत आणि चलनात परत आला, तर त्यामुळे परदेशातून होणाऱ्या सोन्याच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होईल आणि देशांतर्गत सोन्याची उपलब्धता वाढेल. सोन्याच्या पुनर्वापराच्या या व्यवस्थित आणि शाश्वत प्रणालीद्वारे आपण ‘आत्मनिर्भर आणि विकसित भारत’ चे स्वप्न साकार करू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी