

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.)। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंदूरवरील स्मृती पुस्तकाचे प्रकाशन केले. या मोहिमेत सहभागी 100 अधिकारी, नौसैनिक, वायुसैनिक आणि इतर सैनिकांच्या वैयक्तिक अनुभवांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन या मोहिमेत सहभागी सैनिकांना मानवंदना असून सैनिकांच्या कर्तव्यपरायणतेचे आणि विजिगिषू वृत्तीचे दर्शन ते घडवते, असे संरक्षणमंत्र्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नागरिकांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली पाहिजे. आपले सैनिक देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्यासाठी मोठा त्याग करतात. हे लक्षात घेऊन त्यायोग्य पात्र नागरिक बनले पाहिजे.
पाकिस्तानला चार दिवसात युध्दविरामास भाग पाडणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचे वर्णन त्यांनी अभूतपूर्व यश असे केले. भारताने आतापर्यंत लढलेल्या इतर सर्व युद्धांपेक्षा हे वेगळे होते, असे राजनाथ सिंह यांनी लिहिले आहे. हे स्मृती पुस्तक केवळ ऐतिहासिक वृत्तांतापुरते मर्यादित नसून शूर सैनिकांचे वैयक्तिक अनुभव ते टिपते. हे पुस्तक आधुनिक युद्धाच्या मानवी पैलूंवरही प्रकाश टाकते, ज्यात नेतृत्व, धैर्य, ताणाखाली निर्णयक्षमता आणि वचनबद्धता रणनीतीचे यशात रूपांतर करते, असे त्यांनी नमूद केले.
हे पुस्तक अधिकृत लष्करी इतिहासलेखनाच्या परंपरांपासून जाणीवपूर्वक वेगळे आहे. या पुस्तकात तिन्ही सेवा, मुख्यालय, एकात्मिक संरक्षणकर्मी, लढाऊ वैमानिक, नौदल पहाराकर्मी, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र दल, विशेष दल संचालक, सिग्नलर, लॉजिस्टिक्स कर्मी, वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण मोहिमेला एकसंध राखणाऱ्या संयुक्त आणि एकात्मिक संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वृत्तांत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule