रत्नागिरी : कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट; शिवसेना उबाठा आक्रमक
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट असल्याचा आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रत्नागिरीतील हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत.
रत्नागिरी : कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट; शिवसेना उबाठा आक्रमक


रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट असल्याचा आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रत्नागिरीतील हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच, दुसरीकडे कॅनिंग कंपन्यांनी आंब्याचे दर अचानक ५० टक्क्यांनी कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंब्याचे दर स्थिर न राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उबाठाने दिला आहे.

रत्नागिरीतील कॅनिंग कंपन्यांमध्ये प्रक्रियेसाठी जाणारा आंबा सध्या मातीमोल भावाने खरेदी केला जात असल्याचा आरोप व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. हंगामाच्या ऐन भरात दर अर्ध्यावर आणून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम कंपन्या करत आहेत, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. या संदर्भात उबाठाचे उपनेते बाळ माने, तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील आणि आंबा शेतकरी व व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश (बाबा) साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

श्री. माने यांनी कंपन्यांना इशारा देताना सांगितले की, रत्नागिरीतील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचा (परराज्यातील) आंबा येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा डावलून बाहेरच्या आंब्याला प्राधान्य दिले जात असल्याने येथील बाजारपेठ कोसळली आहे. हा बाहेरचा आंबा जिल्ह्यात येणे आम्ही कायमचे बंद करू. स्थानिक शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत.

रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. जर येत्या काही दिवसांत कंपन्यांनी आपले दर सुधारले नाहीत आणि दर स्थिर ठेवले नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. प्रकाश (बाबा) साळवी यांनीही बागायतदारांच्या या लढ्यात शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande