
नवी दिल्ली, ११ जून (हिं.स.)तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रकाश चिक बाराईक यांनीही राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर बाराईक यांनी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या १९ लोकसभा खासदारांनी आधीच बंड पुकारले असून, स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे राज्यसभेत १०, तर लोकसभेत २८ खासदार आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी आपल्या पक्षाचे खासदार आणि आमदार यांना एकत्र ठेवण्यात अपयशी ठरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ८० विधानसभा जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी ५८ जागांवर स्वतंत्र गट स्थापन करून बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे.
प्रकाश चिक बाराईक हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्या पाठोपाठ त्यांनीही राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्यसभेत टीएमसी दोन गटांमध्ये विभागली जात असल्याचे दिसत आहे. ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार जिल्ह्याचे रहिवासी असून टीएमसीचा एक प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जातात. राजकारणात येण्यापूर्वी ते चहाच्या मळ्यातील कर्मचारी आणि कामगार नेते म्हणून सक्रिय होते.
प्रकाश चिक बाराईक हे तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी मानले जातात. पक्षाने त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून दिले. त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक अलीपूरद्वार मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी २००४ मध्ये उत्तर बंगाल विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सिलीगुडी येथील सूर्य सेन कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे