
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर हल्ले झाले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांना अत्यंत चिंताजनक म्हटले असून, असे हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकी सैन्याने हल्ला केलेल्या एका जहाजावरील तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे, जे सुरुवातीला बेपत्ता असल्याचे वृत्त होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत मध्य पूर्वेत भारतीय खलाशांशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही आमच्या खलाशी समुदायाच्या कल्याणाला आणि सुरक्षेला खूप महत्त्व देतो. हे पुन्हा सांगण्याची गरज नाही.
जयस्वाल म्हणाले, आम्ही ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला, ज्यात दुर्दैवाने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. आमचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आम्ही यूएस सीडीएला येथे बोलावले. या प्रदेशात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत. हे हल्ले थांबवलेच पाहिजेत. आम्ही संवाद आणि राजनैतिक संबंधांचे आवाहन करतो, जेणेकरून या प्रदेशात लवकरच शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल.
हल्ल्यांविषयी माहिती देताना, नौवहन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल म्हणाले की, ८ जूनपासून भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांवर हल्ले झाले आहेत. ८ जून रोजी, 'मारिव्हेक्स' या जहाजाला आग लागल्याची माहिती मिळाली. जहाजावरील सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले. त्यानंतर, १० जून रोजी, २४ भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या 'एमटी सेट्टेबेलो' या जहाजावर हल्ला झाला. यापैकी तीन भारतीय खलाशी ठार झाले, तर २१ जणांना सुखरूप वाचवण्यात आले. ११ जून रोजी झालेला ताजा हल्ला एमटी जलवीरवर झाला. जहाजावरील सर्व २० भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे