
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.)
नेपाळमध्ये भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे किंवा स्थगिती देण्यात आली आहे, अशा आशयाची माहिती काही प्रसार माध्यमांनी दिल्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नजरेस आले आहे. ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.
भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी घातलेली नाही, असा खुलासा नेपाळ सरकारने आपल्या वनस्पती अलगीकरण व कीटकनाशके व्यवस्थापन केंद्र (राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना, नेपाळ) च्या माध्यमातून 10 जून 2026 रोजी केला आहे. वनस्पतीच्या आरोग्याविषयी लागू अटीशर्तींच्या पूर्ततेच्या निकषावर आयातीला परवानगी आहे. अटीशर्तींच्या पूर्ततेनंतर भारत सरकारने दिलेली वनस्पतीच्या आरोग्याबद्दलची वैध प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर आयात परवाने आणि माल सोडण्याचे आदेश दिले जात आहेत.
भारतीय आंब्याची नेपाळला निर्यात विनाव्यत्यय सुरू आहे. जानेवारी 2026 पासून एकूण 149 खेपांमध्ये 2005 मेट्रीक टन आंबा नेपाळला निर्यात केला आहे. एकट्या जून 2026 मध्ये आजतागायत 18 खेपांमध्ये एकूण 266 मेट्रीक टन आंबा निर्यात केला आहे.
नेपाळने अलीकडेच आयातविषयक ठराविक अटींमध्ये सुधारणा केल्या असून त्यामध्ये नियंत्रित तापमानाच्या गरम पाण्यात आंबे धुण्याची प्रक्रिया – हॉट वॉटर ट्रीटमेंटचा समावेश आहे. नेपाळने निश्चित केलेल्या आयातविषयक अटींचे पालन करून भारताने निर्यात कायम ठेवली आहे. त्याचबरोबर, पूर्व सल्लामसलतीविना वनस्पती आरोग्यविषयक नव्या अटी लागू केल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, जागतिक व्यापार संघटनेचा आरोग्य व वनस्पती आरोग्य करार (डब्ल्यूटीओ एसपीएस) आणि आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण करार – आयपीपीसीच्या चौकटीला अनुसरून योग्य द्विपक्षीय व्यासपीठांवर भारत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
आयात व निर्यात नियंत्रणाविषयी माहितीसाठी अधिकृत संवादावर अवलंबून राहावे आणि भारतीय आंब्याच्या नेपाळमधील आयातीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातल्याच्या कथित व अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला भागधारक, व्यापारी आणि जनतेला मंत्रालयाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी