
जालना, 24 जून (हिं.स.)दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भूसंपादन व जप्ती प्रकरणात जालना जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रयत्नांतून कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी रुपये 1 कोटी 31 लाख 93 हजार 56 इतकी रक्कम उच्च न्यायालयात जमा केली आहे. या कार्याबद्दल मौजे देवला, ता. परतूर येथील रामदास लाटे व शंकर लाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
संबंधित भूसंपादन व जप्ती प्रकरण अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणात न्यायालयीन आदेशानुसार आवश्यक रक्कम जमा करण्याची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पाटबंधारे विभागाने आवश्यक निधीची पूर्तता करून एकूण रु.1,31,93,056 इतकी रक्कम उच्च न्यायालयात जमा केली.
या निर्णयामुळे संबंधित जमीनधारकांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून प्रकरण निकाली निघण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मौजे देवला येथील रामदास लाटे व शंकर लाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संबंधित प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून न्यायालयीन प्रक्रियेला गती दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis