
लातूर, 05 जून (हिं.स.) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक व सुसज्ज नेत्र शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे.
या शस्त्रक्रियागृहात आज डॉ. कडावकर आणि डॉ. राखुंडे यांच्या उपस्थितीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.
आमदार अभिमन्यू पवार यांनी माहिती देताना सांगितले की, या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या सुविधेमुळे स्थानिक स्तरावरच आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis