
अमरावती, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियान तसेच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत आज शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा दवाखाना आसिर कॉलनी, तारखेडा, नमक कारखाना मागे वलगाव रोड येथे असलेल्या महानगरपालिका जागेवर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व पर्यावरणपूरक वातावरणात पार पडला.
जागतिक स्तरावर हवामान बदल, वाढते तापमान, वायू प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रम वर्षा लड्डा, आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण रक्षणासाठी केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान माझी वसुंधरा अभियान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, ऊर्जा बचत, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती आणि हरित विकासासाठी सामूहिक शपथ घेतली. वातावरणीय कृती, निसर्गापासून प्रेरित, वातावरणासाठी आपल्या भविष्यासाठी या घोषवाक्याला अनुसरून सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होत सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान देण्याची तयारी दर्शविली. लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी यांनी स्वीकारली.
जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून पर्यावरणाबद्दलची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणारा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या उपक्रमातून शहरात हरित क्षेत्र वाढविणे, वायू प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
वाढते शहरीकरण, घटते हरित क्षेत्र आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत वृक्ष हे पर्यावरणाचे खरे रक्षक असल्याचे अधोरेखित करत या कार्यक्रमातून नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे शहरात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून, हरित आणि स्वच्छ अमरावती घडविण्याच्या दिशेने महानगरपालिकेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी