
बीड, 05 जून, (हिं.स.)। चौसाळा व परिसरातील गावांमध्ये कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वीज ग्राहकात नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठ्यातील सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरातील महागडी विद्युत उपकरणे खराब होत असून नागरिकांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चौसाळा व परिसरात विविध भागांत अचानक वीजदाब वाढणे किंवा कमी होणे हा प्रकार नित्याचा बनला आहे. परिणामी रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच, पंखे, वातानुकूलन यंत्रणा, संगणक, इन्व्हर्टर, मोटारी तसेच इतर विद्युत उपकरणे खराब होत आहेत. अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. जे नागरिक नियमितपणे वीजबिले भरतात त्यांना दर्जेदार व सुरक्षित वीज पुरवठा देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अपेक्षित गांभीर्य दिसून येत नाही. तसेच सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी तांत्रिक कारणांचा शोध घ्यावा आणि नुकसानग्रस्त ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा. तसेच वीज वितरण व्यवस्था, रोहित्रांची क्षमता, जुन्या झालेल्या वाहिन्या व तांत्रिक यंत्रणेची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis