
बीड, ५ जून (हिं.स.) : मराठा आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या तसेच आंदोलनादरम्यान अपघाती मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यातील १५ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.निधी उपलब्ध झाल्यानंतर आता या कुटुंबीयांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत नोकरी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. प्रशासनाने शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी २०२३ नंतर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सरकारी आकडेवारीनुसार ७९ जणांनी या लढ्यात प्राण गमावल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही सातत्याने करण्यात येत होती.
मदत मंजूर झालेल्या कुटुंबीयांमध्ये कृष्णा अलगुडे (दिमाखवाडी), नितीन चव्हाण (सुगाव), रामेश्वर मते, कृष्णा पायघडे (भडंगवाडी), भागवत चव्हाण (इमामपूर), नारायण कवठेकर (पिठ्ठी), बाळू सातपुते (डोंगरकिन्ही), हरी भिसे (तांदळवाडी), सतीश देशमुख (वरपगाव), पांडुरंग घुमरे (मैंदा), शहादेव रसाळ (मांजरसुंबा), महारुद्र खाकरे (वाकनाथपूर), अंकुश बावणे (आमला), भरत खरसाडे (आहेरवडगाव) आणि अशोक कादे (बागपिंपळगाव) यांचा समावेश आहे.
प्रशासनाने सांगितले की, निधी वितरित करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल तसेच पात्र वारसांची यादी नोकरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis