व्हेनेझुएलातून भारतीय खलाशाचा मृतदेह अहवालाशिवाय पाठवला भारतात ; पुन्हा शवविच्छेदनाची मागणी
नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये भारतीय खलाशी राकेश चौहान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मृत्यूबाबतची सविस्तर माहिती आणि स्थानिक शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवाल न देता उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक
व्हेनेझुएलातून भारतीय खलाशाचा मृतदेह अहवालाशिवाय पाठवला भारतात ; पुन्हा शवविच्छेदनाची मागणी


नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये भारतीय खलाशी राकेश चौहान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मृत्यूबाबतची सविस्तर माहिती आणि स्थानिक शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवाल न देता उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडियाने मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय व्यक्त करत भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, भारतात करण्यात आलेल्या अधिकृत शवविच्छेदनात मृतदेहातील एकही प्रमुख अंतर्गत अवयव आढळला नाही. अहवालानुसार, मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, स्वादुपिंड, जठर, आतडी, थायरॉईड, हायॉईड हाड, स्वरयंत्र (लॅरिंक्स) आणि श्वासनलिका (ट्रॅकिया) यांसह अनेक महत्त्वाचे अवयव गायब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

युनियनने असा दावाही केला आहे की, मृतदेहावर आधीच शस्त्रक्रियेसारखे अनेक टाके घालण्यात आले होते. त्यामध्ये मानेपासून प्यूबिक सिम्फिसिसपर्यंत २२ टाके, तसेच एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत २१ टाके असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.शवविच्छेदन अहवालात मृत्यूपूर्वी झालेल्या कोणत्याही गंभीर दुखापतीचे स्पष्ट पुरावे आढळले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच मृतदेह सुमारे एक महिना डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण निश्चित करता आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडियाने वेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. तसेच व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूच्या परिस्थितीची माहिती जाहीर करावी, तसेच मृताच्या कुटुंबाला न्याय आणि योग्य भरपाई मिळवून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande