
लातूर, 11 जुलै (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात बोअरवेलची केबल चोरी केल्याच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोअरवेलची केबल चोरी केल्याचा संशय व्यक्त करत गावातील काही व्यक्तींनी तिन्ही मुलांना पकडून खांबाला बांधले आणि त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, प्राथमिक तपासात केबल चोरीच्या प्रकरणात संबंधित मुलांवरही स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis