विद्याविहार उड्डाणपूल ३१ ऑगस्ट, मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या दोन्ही आर्मचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
* अतिरिक्त मनपा आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी * उड्डाणपूल प्रकल्पाचे काम विहित वेळेत वेगाने करण्याचे निर्देश मुंबई, 11 जुलै (हिं.स.) - विद्याविहार येथील उड्डाणपूल दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ तर मानखुर्द महाराष्ट्
उड्डाणपूल


उड्डाणपूल


उड्डाणपूल


* अतिरिक्त मनपा आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी

* उड्डाणपूल प्रकल्पाचे काम विहित वेळेत वेगाने करण्याचे निर्देश

मुंबई, 11 जुलै (हिं.स.) - विद्याविहार येथील उड्डाणपूल दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ तर मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या दोन्ही आर्मचे काम दिनांक ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करावे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि संयंत्रे वापरून निर्धारित कालावधीत पुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. प्रकल्पस्थळी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे देखील निर्देश त्यांनी दिले.

मानखुर्द - महाराष्ट्र नगर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथे उड्डाणपूल प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांनी आज (दिनांक ११ जुलै २०२६) सकाळी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊन प्रकल्पांचा आढावा घेतला.

मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमित सकाळी आणि रात्री मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी होते. परिणामी स्थानिक रहिवाशासह मुंबईवरून वाशीकडे तसेच वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या स्वरूपात सामना करावा लागतो. यासोबतच घाटकोपर ते मानखुर्द आणि मानखूर्द ते घाटकोपर या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर परिणामकारक उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर -मानखुर्द उड्डाणपूला वरून थेट वाशीकडे जाणारा आर्म - १ आणि सायन पनवेलच्या महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपूल येथून घाटकोपरकडे जाणारा आर्म- २ उड्डाणपूल अशी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

श्री. बांगर म्हणाले की, अतिरिक्त मनुष्यबळ आणि संयंत्रे वापरून दोन्ही आर्मचे काम दिनांक ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करावे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना कामगार- कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचे सर्व उपाय करावेत. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सक्त निर्देश श्री. बांगर यांनी दिले. पूल प्रकल्पाच्या अनुषंगाने महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचा आढावादेखील श्री बांगर यांनी घेतला.

त्यानंतर श्री. बांगर यांनी विद्याविहार पूल प्रकल्प कार्यस्थळास भेट दिली. सध्या या उड्डाणपुलाचे काम सुमारे ८० टक्के झाले आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

विद्याविहार पूर्वेला तसेच पश्चिमेला पोहच रस्त्याच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी एन विभागाचे अधिकारी, उद्यान व वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने नियोजन करावे. पुलाच्या पूर्व तसेच पश्चिम दिशेला वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी ठिकाणे, आस्थापना, पदपथ, झाडे यांच्याशी संबंधित सुनियोजन करावे. अधिक गर्दीच्या वेळेत पुलाच्या पोहच रस्त्यापासून वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, असेही श्री बांगर यांनी निर्देश दिले.

प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपूल प्रकल्पाची माहिती

प्रस्तावित आराखड्यानुसार उड्डाणपूल आर्म-१ हा घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग (GMLR) उड्डाणपुलावरून वाशीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र दोन-लेनचा, १,४२० मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध करून देणार आहे, तर उड्डाणपूल आर्म २ हा वाशीकडून येणाऱ्या वाहनांना विद्यमान घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग उड्डाणपुलावर जाण्यासाठी दुसऱ्या स्तरावरील स्वतंत्र दोन-लेनचा, १,९५१ मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा उड्डाणपूल उपलब्ध करून देणार आहे.

या दोन्ही उड्डाणपुलांमुळे सायन-पनवेल महामार्गावरील टी-जंक्शनवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक गतिमान होण्यास मदत होईल. . या पूल प्रकल्पाचे काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दिनांक १५. ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे ३३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नियोजनानुसार प्रगतीपथावर आहे.

*

विद्याविहार पूल प्रकल्पाची माहिती

लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग (Approach Road) बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग देखील दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी केली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उप-रस्त्याला जोडला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande