
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावली येथील शेतकरी राजाराम नागनाथ राऊत यांचा २६ वर्षीय मुलगा संजय राजाराम राऊत याचा विवाह १० मे २०२६ रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथील स्नेहल ननवरे हिच्याशी झाला होता.
तक्रारीनुसार, विवाहानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. पत्नी स्नेहल हिने संजय याला पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच तिचे सौरभ शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असून त्याच्यासोबतच राहायचे असल्याचे ती सांगत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कारणावरून ती संजय याच्याशी वारंवार वाद घालत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या कथित प्रकारामुळे संजय मानसिक तणावाखाली होता, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर संजय आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले.
या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्याआधारे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड