
मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेसने विमानतळावरून अबू धाबीसाठी पहिले उड्डाण केले.
एअर इंडिया एक्सप्रेसने विमानतळावरून अबू धाबीसाठी पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण संचलित केले. सुमारे १०० प्रवाशांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान भारतीय वेळेनुसार पहाटे २:५५ वाजता (आयएसटी) रवाना झाले. सुमारे अडीच तासांचा प्रवास करून हे विमान संयुक्त अरब अमिराती (यूएई)तील अबू धाबी विमानतळावर उतरले.
विमान कंपनीच्या माहितीनुसार, हे उड्डाण एअर इंडिया एक्सप्रेसच्या बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानाद्वारे संचलित करण्यात आले. उड्डाणापूर्वी विमानाच्या वैमानिकाने हा प्रवास ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या उड्डाणासह लवकर खराब होणाऱ्या (पेरिशेबल) उत्पादनांची पहिली आंतरराष्ट्रीय खेपही पाठविण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा अबू धाबीसाठी उड्डाणे संचलित करणार आहे.
विशेष म्हणजे, २५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत सेवांना सुरुवात झाली होती. या विमानतळाचा विकास अनेक टप्प्यांत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयएएल) करत आहे. ही एक विशेष उद्देश संस्था असून, त्यामध्ये एएएचएलची ७४ टक्के हिस्सेदारी आहे, तर उर्वरित हिस्सेदारी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सिडको)कडे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule