राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट
मुंबई, 21 जुलै (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील
MH Heavy rainfall warning next five days


मुंबई, 21 जुलै (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २१ जुलै ते २६ जुलैदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या गुजरात किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागासह पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैदरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम आहे.

२३ जुलै रोजी कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. २४ जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. २५ जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील किनारी भाग आणि घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस वाऱ्याचा वेग वाढण्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande