नीट पेपर फूट : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
राहुल, प्रियंका आणि खरगे झाले सहभागी नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : कथित नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यां
पंतप्रधानांच्या निवासाबाहेर आंदोलन करताना राहुल गांधी आणि प्रियंका वाद्रा


राहुल, प्रियंका आणि खरगे झाले सहभागी

नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : कथित नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे प्रत्येक भारतीय कुटुंबावर हल्ला आहे. पंतप्रधान मोदींना वाटते की ते उत्तर न देता आणि जबाबदारी न स्वीकारता सुटू शकतात. तसे होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी इच्छा असलेल्या प्रत्येक देशभक्त भारतीयाने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील धरण्यात सहभागी व्हावे. भारतातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही असे त्यांनी नमूद केले.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना आंदोलक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी सुरुवातीला संसदेत नीट प्रश्नपत्रिका गळती आणि त्यावरील आंदोलनावर चर्चा घेण्याची मागणी केली होती, ज्यास सरकारने तत्त्वतः सहमती दर्शवली. मात्र त्यानंतर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने चर्चेत तोडगा निघू शकला नाही. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सहभाग घेत काँग्रेसला पाठिंबा दर्शविला.सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका वाड्रा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलन समाप्त केले.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळल्याचा आरोप करत या प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये, देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

नीट प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधातील आपला संघर्ष अधिक तीव्र केला असून, या प्रकरणात सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी मागणी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande