
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे अंतर्गत समरदुंग येथे बांधकाम सुरू असलेल्या एनएचपीसी तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या अपघातासंदर्भात सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि परिस्थिती व सुरू असलेल्या बचाव कार्याची विचारपूस केली.
मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, पंतप्रधान मोदींनी बाधित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांची आस्था, संवेदनशीलता आणि सहकार्याच्या वचनबद्धतेमुळे या कठीण काळात सिक्कीमच्या लोकांना मोठे बळ आणि आत्मविश्वास मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसएसडीएमए), जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस, रंगपो प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पीएचसी) वैद्यकीय पथक आणि स्थानिक समुदाय हे बचावकार्य यशस्वी करण्यासाठी आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी समन्वयाने अथकपणे काम करत आहेत.
सिक्कीमच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री तामांग म्हणाले की, दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी दिलेला पाठिंबा, संवेदनशीलता आणि राज्याप्रती दाखवलेली एकजूट अत्यंत प्रेरणादायी आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि भारत सरकारचा पाठिंबा व वचनबद्धतेबद्दल सिक्कीम नेहमीच कृतज्ञ राहील. हे विशेष उल्लेखनीय आहे की, दक्षिण सिक्कीममधील समरदुंग येथील एनएचपीसीच्या बोगद्यात कथित गॅस गळती आणि ढिगारा कोसळल्याने आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे