
रत्नागिरी, 3 जुलै (हिं.स.) । राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. सागर शिवाजी कळंबटे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले अॅड. कळंबटे यांनी कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मंडळातर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करत असताना प्रथम २०१९ मध्ये जिल्हा पंच म्हणून त्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर २०२२ मध्ये राज्य आणि यावर्षी २०२६ मध्ये राष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन रत्नागिरीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवण्याचे काम अॅड. कळंबटे यांनी केले आहे.
गेल्या ७ वर्षांत अनेक तालुका, जिल्हा व राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करतानाच राज्य पंच म्हणून सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी चाचणी स्पर्धा व कबड्डी स्पर्धांमध्येही पंच म्हणून ॲड. कळंबटे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
यापुढे देशासाठी पंच म्हणून जबाबदारी आहे. ती उत्तमरीत्या पार पाडून कोकणचे नाव सर्व देशात करणार आहे. संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण जगात कोकणचे नाव पोहोचवायचे आहे, अशी प्रतिक्रिया ॲड कळंबटे यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी