
रत्नागिरी, 3 जुलै, (हिं.स.) । सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने 'समाधान समारोह २०२६' अंतर्गत आगामी २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आपसी समन्वयातून आणि तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या समाधान समारोह उपक्रमांतर्गत प्रकरणे संदर्भित करण्याची अंतिम मुदत आता ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र प्रकरणे आपसी संमतीने सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद वाय. जाधव तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबाळकर यांनी केले आहे.
गेल्या २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा समारोप ऑगस्ट महिन्यातील विशेष लोकअदालतीद्वारे होणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी व तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 'सहभागी न्याय' आणि 'न्याय आपल्या दारी' या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
पक्षकारांना तसेच संबंधित प्रकरणातील वकिलांना आभासी व्यासपीठाद्वारे या विशेष लोकअदालतीमध्ये उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने सोडवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
विशेष लोकअदालतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे : ते असे - ८५९१९०३६०८, (०२३५२) २२४७६८.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी