
लातूर, 04 जुलै (हिं.स.)। अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी व अन्य साहित्य चोरीप्रकरणी सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हाधिकारी, लातूर यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, आस्था आणि अस्मितेचे प्रतीक असून अशा पवित्र स्थळी झालेली चोरी ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटना आहे. या घटनेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अथवा उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच चोरीमागील सूत्रधारांसह संबंधित सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष (पश्चिम) प्रा. प्रशांत घार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष (पूर्व) ॲड. निशांत वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साळुंखे, लातूर विधानसभा अध्यक्ष आदर्श उपाध्ये, औसा विधानसभा अध्यक्ष ॲड. यशवंतराव भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis