
नाशिक, 04 जुलै (हिं.स.)। गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणक्षेत्रांत मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नाशिककरांना पाणीटंचाईच्या चिंतेतून दिलासा मिळण्याचे चिन्ह आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे, काश्यपी धरणांसह जिल्ह्यातील रणा आणि भावली चणकापूर अन्य प्रमुख धरणांमध्ये पाणी पातळी लक्षणीय वाढली आहे.
जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ३३२ मि. मी. घोटी २३२, त्र्यंबक २०९, तर अंबोली परिसरात सर्वाधिक ३९९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील अन्य विविध भागांत १०० ते २०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याने कृषी आणि पेयजलासाठी महत्त्वाच्या धरणांमध्ये सतत आवक सुरू आहे. गंगापूर धरणात समाधानकारक आवक नोंदवली गेली असून, उपयुक्त पाण्याची पातळी ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. मुकणे धरणातही वाढ झाली असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही पावसाने जलसाठ्यांना बूस्ट मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून पाणी बचत उपाययोजना राबवण्यात येत होत्या. मात्र, या पावसाने टंचाईची भीती कमी झाली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने धरणांच्या गेट्सबाबत सतर्कता वाढवली असून, पावसाचे पुढील अंदाज लक्षात घेता पूर नियंत्रण योजनेवर काम सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
---------
१ जुलैपासूनचा विविध धरणक्षेत्रांत पाऊस
दारणा - ९४ मि. मी
मुकणे -१२२ मि. मी
भावली - ४६६ मि. मी
वाकी - १२३ मि. मी
भाम - २५० मि. मी
वालदेवी - ११४ मि. मी
गंगापूर - १५२ मि. मी
कश्यपी- १६६ मी.मी
गौतमी -गोदावरी -१९१ मि. मी
ओझरखे़ड - १०१ मि. मी
--------------
येवला, विंचूर भागाला दमदार पावसाची प्रतीक्षा
पावसाळ्याच्या सुरुवातीला येवला, विंचूर परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस होत असताना येवल्यात १जुलैपासून केवळ १० मि.मी, विंचूर १८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV