
बीड, 05 जुलै (हिं.स.)।
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तालुक्यातील एकूण ६२३ शिक्षकांपैकी तब्बल ५५० शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याने केवळ ७३ शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील अध्यापनावर गंभीर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, विशेष म्हणजे बीएलओंना सहाय्यक म्हणूनही अनेक शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आल्याने शाळांमधील शिक्षकांची संख्या आणखी घटली आहे. अनेक शाळांमधील ५० ते ९० टक्के शिक्षक वर्गाबाहेर गेले असून, काही शाळांमध्ये मोजकेच शिक्षक उरले आहेत. काही शाळा प्रत्यक्षात शिक्षकविरहित झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मतदार नोंदणी, घरभेटी, एसआयआर सर्वेक्षण आणि अन्य अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षक गुंतल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना याचा फटका बसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis