
बीड, 05 जुलै (हिं.स.)।
चौकशीदरम्यान अभिलेखे सादर केले नाही, तसेच ग्रामपंचायतचे कामकाज शासकीय नियमानुसार केले नसल्याचा ठपका ठेवत गेवराई तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच राधा विष्णू पिसाळ यांच्याविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सावरगाव येथील संतोष नारायण जाधवर व रणजित लक्ष्मण नागरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर विभागीय आयक्त कार्यालयाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी समिती सावरगाव येथे तपासणीसाठी गेली होती. यावेळी समितीने मागणी करूनही संबंधित
सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोणतेही अभिलेखे उपलब्ध करून दिले नसल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला कळविला. त्यानंतर या संदर्भात १८ जून २०२६ रोजी बीड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली.
या सुनावणीतही अभिलेखे किंवा पुरावे सादर केले नाहीत, तसेच ग्रामपंचायतचे कामकाज शासकीय नियमानुसार केले नसल्याने त्यांची कृती सरपंच पदाचा गैरवापर करणारी असल्याचे अभिप्रायात स्पष्ट करून मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सावरगावच्या सरपंच राधा विष्णू पिसाळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ (१) नुसार कार्यवाहीसाठी ३ जुलै रोजीच्या पत्रादारे आयक्तांकडे शिफारस केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis