
रायगड, 05 जुलै (हिं.स.)। : खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजीवली गाव परिसरातील एका खासगी कंपनीतून सुमारे ₹65 हजार किमतीचा माल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीतीलच दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीवली येथील रेन्युसिस इंडिया प्रा. लि. कंपनीत मेंटेनन्स विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पेण तालुक्यातील वाशी परिसरातील रहिवासी असून संबंधित कंपनीत प्रशिक्षण (ट्रेनी) कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून कंपनीच्या मालकीचा सुमारे ₹65,000 किमतीचा माल फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी अपहाराच्या उद्देशाने चोरी करून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 277/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 306 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना दि. ४ जुलै २०२६ रोजी रात्री १०.४६ वाजता अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत असून, चोरी गेलेला माल पूर्णपणे हस्तगत झाला आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)