मुंबई-पुणे हायवेवर पाण्याचे साम्राज्य; वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन
रायगड, 05 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना सावधपणे प्रवास करावा लागला. सततच्या पावस
Water inundates Mumbai-Pune Highway; motorists urged to exercise caution.


रायगड, 05 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना सावधपणे प्रवास करावा लागला.

सततच्या पावसामुळे महामार्गावरील सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा मंदावल्याने रस्त्यावर पाणी साचले. परिणामी काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. विशेषतः चारचाकी, दुचाकी तसेच मालवाहू वाहनचालकांना कमी वेगाने प्रवास करावा लागला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळाले.

वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. वाहनचालकांना सुरक्षित अंतर ठेवून आणि वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, तसेच प्रवास करताना वाहतूक विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामार्गावर पाणी साचल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नसली तरी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande