
सोलापूर, 05 जुलै, (हिं.स.)।पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटून गेला असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरवल्याने भूजलपातळीत मोठी घट झाली असून अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. परिणामी, ऐन पावसाळ्यातही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.यंदा एल निनोच्या परिणामांची झळ जिल्ह्याला बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षी १२ जूनपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जुलै महिना सुरू होऊनही पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.सध्या जिल्ह्यातील २० गावे आणि ११३ वाड्या-वस्त्यांना २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
वाढत्या टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने १७ विहिरी आणि ३ बोअरवेलचे अधिग्रहण केले असून, त्यातून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.भूजलपातळीझपाट्याने खालावतअसल्यानेउत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, माळशिरस, अक्कलकोट, बार्शी आणि माढा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतही पुरेसा पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड