
अमरावती, 08 जुलै (हिं.स.) | अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे भारतासह जगात जागतिक मंदीसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आर्थिक सत्ता बनण्याची स्वप्ने पाहणारा भारत देश या धक्क्यातून बाहेर पडला नाही. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याने आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत निर्यातीत प्रथमच १,०५१ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील या विक्रमी कामगिरीमुळे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील उदयोन्मुख निर्यात केंद्र म्हणून अधिक ठळकपणे पुढे आला आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४७.४ टक्के वाटा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा असून, विभागात जिल्ह्याने सलग अव्वल स्थान कायम राखले आहे. अमरावती विभागाची निर्यात एकूण २,२१८ कोटीची आहे. या निर्यातीपैकी सर्वाधिक १,०५१ कोटी रुपयांची निर्यात बुलढाणा जिल्ह्यातून झाली आहे. विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये अकोला ५१९ कोटी, अमरावती ३५० कोटी, यवतमाळ २५७ कोटी आणि वाशीम ४१ कोटी रुपये अशी निर्यातीची क्रमवारी आहे. या आकडेवारीवरून विभागातून निर्यात होणाऱ्या प्रत्येक दोन रुपयांपैकी जवळपास एक रुपयांचा माल बुलढाणा जिल्ह्यातून परदेशात जात असल्याचे स्पष्ट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी