
छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)।
केंद्र शासनाच्या पद्म पुरस्कारांसाठी शिफारस प्रस्ताव सादर करण्याबाबत शासनाने निकष स्पष्ट केले असून,पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय,विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर पात्र व्यक्तींच्या शिफारसी ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर कराव्यात.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारे नामांकन अथवा शिफारसी स्वीकारल्या जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
शासनाने जारी केलेल्या निकषांनुसार,पद्मभूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पाच वर्षांनी,तर पद्मविभूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मभूषण पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पाच वर्षांनी करता येईल.मात्र, अपवादात्मक प्रकरणांमध्ये ही अट शिथिल करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
तसेच,शासकीय सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रमांतील डॉक्टर व वैज्ञानिक वगळता अन्य कर्मचारी व अधिकारी पद्म पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत,असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
वरील निकषांच्या आधारे शिफारसयोग्य प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय,विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत.त्यानंतर या पोर्टलवर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
*****
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis