
यवतमाळ, 08 जुलै, (हिं.स.) - यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण अपेक्षेप्रमाणे न झाल्याने ५० हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक ठिकाणी बियाणे वांझोटे ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दुबार पेरणीमुळे वाढणारा खर्च आणि संभाव्य आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीन उत्पादकांसाठी यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीलाच धोक्याची घंटा ठरू लागला आहे. हंगामाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणी पूर्ण केली. बियाणे, रासायनिक खते, मशागतीसह मजुरीचा वाढलेला खर्च सहन करत अनेकांनी कर्ज काढून शेतीत गुंतवणूक केली. मात्र पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये उगवण अत्यंत विरळ झाल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी रोपे विखुरलेल्या स्वरूपात दिसत असली तरी मोठ्या प्रमाणावर शेतात रिकामे पट्टे तयार झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या मते केवळ १० टक्केच उगवण झाली.
पंचनामे करा; दोषींवर कडक कारवाईची मागणी जिल्हाभरातून तक्रारी वाढत असताना कृषी विभागाने प्रत्येक बाधित शेताची पाहणी करून पंचनामे करावेत. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत. दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल कराव्या सोयाबीनचे बियाणे न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तालुका कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच े पथक पाहणी करत आहे. काही कंपन्यांनी बियाणे देऊ केले आहे. बियाणे उगवले नसल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी कराव्या. असे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी