



रायगड, 08 जुलै (हिं.स.)। : अतिवृष्टीमुळे क्षेत्रपाल धनगरवाडी परिसरात दरड कोसळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य हाती घेत २६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या नागरिकांमध्ये नऊ महिला आणि १७ पुरुषांचा समावेश असून, त्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
ही घटना ६ जुलै रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सुमारे ८०० मीटर परिसरात दरड कोसळल्याची माहिती मिळताच महसूल विभागासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जव्हार रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमी नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.
घटनास्थळी काही ठिकाणी जमिनीला आणि डोंगरभागाला भेगा पडल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संभाव्य धोक्याच्या क्षेत्रातील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर केले. परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून यंत्रणांकडून सातत्याने पाहणी सुरू आहे.
दरड कोसळल्यामुळे बाधित झालेल्या भागात वीजपुरवठा खंडित झाला असून, महावितरणकडून तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रस्त्यावर साचलेली माती आणि दरड हटविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
स्थलांतरित नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात येत असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी दरडप्रवण भाग, डोंगर उतार आणि भेगा पडलेल्या परिसरापासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)