वारकऱ्यांच्या स्वागतासाठी बॅनरवर २.१० कोटींचे टेंडर?; पर्यावरणप्रेमींकडून वृक्षलागवडीची मागणी
सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी डिजिटल फलक आणि बॅनर उभारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने २ कोटी १० हजार रुपयांचे टेंडर काढल्याचा दावा करण्यात येत असून, त्यावरून पर्यावरणप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थि
evm


सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी डिजिटल फलक आणि बॅनर उभारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने २ कोटी १० हजार रुपयांचे टेंडर काढल्याचा दावा करण्यात येत असून, त्यावरून पर्यावरणप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल बॅनर आणि फलक उभारण्यापेक्षा त्याच निधीतून वारकरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल आणि भविष्यात वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना नैसर्गिक सावलीचा लाभही मिळू शकेल.

त्यांच्या मते, बॅनर आणि फलक हे तात्पुरते साधन असून त्यातून प्लास्टिक व अन्य कचऱ्याची निर्मिती होण्याची शक्यता असते. त्याऐवजी रस्त्यालगत दीर्घकालीन वृक्षलागवड केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, तसेच वारकरी आणि स्थानिक नागरिकांनाही त्याचा फायदा होईल.

दरम्यान, २ कोटी १० हजार रुपयांच्या टेंडरबाबत अधिकृत कागदपत्रे किंवा जिल्हा परिषदेची भूमिका अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे या दाव्याबाबत अधिकृत माहिती समोर येणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच या विषयाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande