
लातूर, 09 जुलै, (हिं.स.)। उदगीरच्या जळकोट रोड परिसरात आज सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून तब्बल सहा दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तब्बल एक तासाहून अधिक उशिराने पोहोचल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तोपर्यंत नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत किराणा दुकानातील मोठ्या प्रमाणात साहित्य बाहेर काढत नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला.
या आगीत नव्याने उभारण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायर प्लांटलाही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांतून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis