
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)धरणग्रस्त जमिनीच्या कथित बेकायदा व्यवहारातून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात तब्बल २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पंडित विरूपाक्ष शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहराजवळील भाटेवाडी येथे वाडकर कुटुंबाला धरणग्रस्त म्हणून शासनाकडून जमीन मिळाली होती. सन २०१२ मध्ये संबंधित जमिनीच्या विक्रीसाठी मालकांनी कृष्ण कन्हैयादास शरदचंद्र देशमुख (रा. मंत्री चंडक, सोलापूर) यांच्यासोबत विक्रीचा करार केला होता.मात्र, करारानुसार जमीन हस्तांतरित न केल्याने देशमुख यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. सुनावणीनंतर न्यायालयाने करारपत्राची अंमलबजावणी करून दोन महिन्यांच्या आत फिर्यादीच्या नावे जमीन खरेदीखत करून देण्याचे आदेश दिले. तसेच, प्रकरण निकाली निघेपर्यंत संबंधित जमिनीचा व्यवहार कोणत्याही तृतीय व्यक्तीसोबत करू नये, असेही स्पष्ट निर्देश दिले होते.तरीही न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित जमीन पंडित विरूपाक्ष शेटे यांच्या नावे विकल्याचा आरोप आहे. खरेदीखत झाल्यानंतर शेटे यांनी महसूल नोंदीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र, फिर्यादी देशमुख यांनी हरकत घेतल्याने उताऱ्यावर नोंद होऊ शकली नाही.यानंतर या प्रकरणात फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला असून, या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत सलगर वस्ती पोलिसांनी २४ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड