
मुंबई, 09 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे विकासपुरुष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. तर माज, मस्ती, अहंकारी, घमेंडी, नशेडी कोण आहे हे पाहण्यासाठी जनाब संजय राऊत यांनी एकदा आरशात पहावे. अडीच वर्षे तुमच्यातील हे सारे गुण पाहूनच महाराष्ट्राने तुमचा माज उतरवून तुम्हाला घरी बसवल्याने विनाकारण नाटकीपणा करू नका. रोज गांजा ओढून वायफळ बडबड करण्यापेक्षा थोडे आत्मचिंतन करा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला.
संजय राऊत आता इतके मोठे आंतरराष्ट्रीय नेते झाले की ते शरद पवारसाहेबांना विश्वासार्हता सांगताहेत. एक दिवस ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेने 2019 साली युतीला निवडून दिले होते. देवेंद्रजी फडणवीस यांना आशीर्वाद दिले होते. मात्र तुम्ही महाराष्ट्राशी, हिंदुत्ववादाशी गद्दारी करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळे खरे गद्दार हे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उबाठा गट आहेत. गद्दारी करत खाल्लेल्या ताटात घाण करणे हा संजय राऊतांचा धंदा झालाय, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.
श्री. बन पुढे म्हणाले, राज्याची बदनामी काय असते हे महाराष्ट्राने उद्धवजींच्या काळात पाहिले आहे. त्यांनी मंदिरे बंद आणि दारूची दुकाने उघडी ठेवली. व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडला. केतकी चितळेला पंधरा दिवस अटक करणारे, पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून कोविडच्या काळात त्यांना बेड्या ठोकणारे, साधूंचे हत्याकांड करणारे आणि महाराष्ट्राला लुटणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही होतात. तुमचे बदनाम सरकार उलथवून टाकण्याचे काम जनतेने केल्याने विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीला तुम्हाला वीस जागाही मिळाल्या नाहीत. संजय राऊत स्वतःकडे पहा, महाराष्ट्राने तुम्हाला झिडकारले आहे, नाकारले आहे. तुमच्या अहंकाराची आणि सत्तेची मस्ती महाराष्ट्राने उतरवली आणि यापुढेही ती उतरवणार आहे.
पुस्तकात पाहूनही उद्धव ठाकरेंना रामरक्षा म्हणता आली नाही संजय राऊत यांनी आपल्या मालकांची मुले कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकतात, हे एकदा महाराष्ट्राला सांगावे. ज्यांना पुस्तकात पाहूनही रामरक्षा वाचता येत नाही अशा आपल्या मालकांना, उद्धवजी ठाकरेंना विचारा की तुम्हाला पुस्तक वाचूनही रामनाम का घेता येत नाही? महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. संजय राऊत तुम्ही भाड्याचे तट्टू आहात. ज्यांनी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केले, औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षपद स्वीकारले, अफजलखानाचा उदो उदो केला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादाशी प्रतारणा करणारे तुम्ही. तुम्हाला निजाम आठवतोय, तुम्हाला मोहम्मद तुघलक आठवतोय यावरूनच तुमची विचारसरणी ही दाढ्या कुरवाळणाऱ्यांची झाली आहे हे स्पष्ट होते, असे श्री. बन यांनी सुनावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर