
रत्नागिरी, 18 ऑगस्ट, (हिं.स.) । सततच्या आजारपणाला कंटाळून एका ४० वर्षीय इसमाने घरात कोणी नसताना छताला गळफास लावून दापोलीच्या बौद्धवाडीत आत्महत्या केली. विश्वजित विश्वनाथ कासारे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजित कासारे गेल्या काही काळापासून सतत आजारी असायचे. वारंवार उद्भवणाऱ्या आजारपणाला ते प्रचंड कंटाळले होते. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना, त्यांनी बेडरूममधील छताच्या लोखंडी बारला कापडी ओढणीने गळफास घेतला. घरातील व्यक्ती परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती विश्वजित यांचे मेहुणे प्रवीण जनार्दन तांबे (वय ४८, रा. बौद्धवाडी, मौजे दापोली ) यांनी तत्काळ दापोली पोलीस ठाण्यात दिली. प्रवीण तांबे यांच्या खबरीवरून पोलिसांनी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी