“राहुल गांधी अराजकतेचे राजकारण करतात”- रविशंकर प्रसाद
पॅलेट गन प्रकरणी राहुलच्या धरणे आंदोलनावर भाजपची टीका नवी दिल्ली, 21 ऑगस्ट (हिं.स.) : जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान कथित पॅलेट गनच्या छर्र्यांमुळे जखमी झालेल्या साहिल याच्यासोबत काँग्रेस खासदार राहुल गांधी संसद मार्गावरील डीसीपी कार्यालयाबाहेर धर
रविशंकर प्रसाद , भाजपचे ज्येष्ठ नेते


पॅलेट गन प्रकरणी राहुलच्या धरणे आंदोलनावर भाजपची टीका

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट (हिं.स.) : जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान कथित पॅलेट गनच्या छर्र्यांमुळे जखमी झालेल्या साहिल याच्यासोबत काँग्रेस खासदार राहुल गांधी संसद मार्गावरील डीसीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनावर भाजपने जोरदार टीका केली आहे.भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर ‘अराजकतेचे राजकारण’ केल्याचा आरोप केला. राहुल गांधी कोणतीही परवानगी किंवा पूर्वसूचना न देता आंदोलनाला बसल्याचा दावा त्यांनी केला.

यासंदर्भात रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांनी लोकशाही पद्धतीने राजकारण करण्याऐवजी अराजकतेचे राजकारण सुरू केले आहे. संबंधित घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणाचा संदर्भ देताना प्रसाद यांनी सांगितले की, संबंधित पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे असून समितीत अन्य न्यायाधीश तसेच सीबीआयचे माजी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.‘गोळीबार झाला की नाही, याचीही चौकशी होणार आहे. अशा परिस्थितीत नियम आणि कायद्याचा आदर न करता केवळ आपल्या इच्छेनुसार आंदोलनाला बसणे योग्य आहे का ?’ असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.

दरम्यान, प्रसाद यांनी काँग्रेसच्या ‘वंदे मातरम्’वरील भूमिकेवरही टीका केली. काँग्रेस या मुद्द्यावर अडचणीत आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींचे आंदोलन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशात चुकीचा संदेश गेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अराजकतेच्या दिशेने जात आहे. ‘वादविवाद करा, कायदा आपले काम करेल; मात्र सुरू असलेल्या चौकशीच्या प्रकरणावरून पोलिस ठाण्याबाहेर धरणे देणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.

राहुल गांधींच्या आंदोलनाचा निषेध करताना प्रसाद यांनी याला ‘स्पर्धेचे राजकारण’ असे संबोधले आणि काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande