
बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालय चा राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत मौजे श्रीपत रायवाडी येथे एक दिवसीय शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात गावातील शेतकरी पुरुष व महिला साठी उद्बोधन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कृषी विद्यापीठ डॉ. अरुण गुट्टे यांनी कमी पर्जन्यमानात सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर तालुका कृषी अधिकारी श्री विजयकुमार पवार यांनी शेतातील तन नियोजन, एल निनो चा परिणाम व त्यावरील उपाय या विषयी माहिती दिली. गावातील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र जाधव यांनी जलसंधारण दिनानिमित्त पाणी बचतीचे महत्त्व व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य मंचक मोरे यांनी पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन कसे करावे हे सांगितले. या कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष शेतकरी, गावच्या सरपंच सौ. सुमनताई पवार,रासेयो स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.
यानंतर गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली, व विविध ठिकाणी एक पेड मा के नाम या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. गावातील प्रगतशील शेतकरी जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीकन्या जाधव यांच्या शेतात विद्यार्थिनींनी भेट दिली व प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभवही घेतला. अशा विविध कार्यक्रमांनी हे एक दिवसीय शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis