
* उद्या ३१ ऑगस्ट पर्यंत मुंबईत पोहोचणार
मुंबई, 30 ऑगस्ट (हिं.स.) - महाराष्ट्रातील ६९ नागरिकांनी काल सायंकाळी उशिरा कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून चीनची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला असून, प्राप्त माहितीनुसार ते उद्या ३१ ऑगस्ट पर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. आपत्तीमध्ये अडकलेल्या ४०४ नागरिकांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (एसइओसी) कडे नोंद असून त्यापैकी राज्यातील २६२ पर्यटक नागरिक अजूनही नेपाळ किंवा चीनमध्ये होते. अजून ६९ नागरिकांना सुखरूप परत आणण्यात यश आले असून यापूर्वी १४२ नागरिक परत आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठपुरावा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अचूक मार्गदर्शन यामुळे एस इ ओ सी द्वारे सुविधा व मदत याद्वारे नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (एसइओसी) द्वारे कार्यवाही करण्यात येत आहे.
नेपाळ येथील महापुराच्या आपत्तीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काम करताना राज्य आपत्कालीन कार्य केंद्र द्वारे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एम ई ए) नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून राज्यातील चीन, तिबेट व नेपाळ च्या आपत्तीग्रस्त भागात गेलेल्या नागरिक पर्यटकांची माहिती पाठवण्यात येते. या आधारे पूरग्रस्त विविध ठिकाणी आवश्यक बचाव पथके तैनात करून व्यक्तींचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण कार्यवाहीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
जिल्ह्य यंत्रणांच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांच्या माहितीची निरंतर पडताळणी. ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबांशी सतत समन्वय, हेल्पलाइनद्वारे प्रतिसाद देणारी यंत्रणा. एकात्मिक नियंत्रण कक्ष (Integrated Control Room) - आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्ष (नवी दिल्ली), एम ई ए नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र सदन (नवी दिल्ली) यांना अद्ययावत माहिती पुरवणे.
यासाठी माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात येऊन नातेवाईक अथवा माहिती संकलित केली जात आहे. सर्व जिल्ह्यांना वेब-आधारित लिंक पाठवण्यात आली असून विविध प्रसारमाध्यमांच्या मधून प्रसारित करण्यात आली आहे. या लिंकद्वारे भरली जाणारी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (एस इ ओ सी) द्वारे संकलित केली जात आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या यंत्रणेच्या संपर्कात राहून काम करताना जिल्ह्य यंत्रणांच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांच्या माहितीची पडताळणी. हेल्पलाइनद्वारे ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबांशी सतत समन्वय 24X 7 केला जात आहे. पर्यटकांना मदतीसाठी सुरक्षितपणे त्यांना परत आणण्यासाठी एसइओसी चे संपर्क क्रमांक:१०७० आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी