
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा आजचा शेतकरी व युवक संवाद मेळावा रद्द करण्याचा आग्रह आपणास योग्य वाटत नाही, त्यामुळे तो मेळावा रद्द होणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.
जरांगे पाटील यांचा आपणास आज सकाळी 11 वाजता मोबाईल आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील शेतकरी व युवक संवाद मेळावा रद्द करावा, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, तसं आता करता येणार नाही, असे आपण नमूद केले. काल रात्री जर दादांनी संवाद मेळावा रद्द करण्याचे म्हटले असते तर निश्चित तसे केले असते. परंतु आज परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत कानाकोपर्यातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याच्या स्थळी येऊ लागले आहेत, मोठी गर्दी उसळत आहे, असे असतांना मेळावा रद्द करणे आपणास उचित वाटत नाही, हे आपण दादांना सांगितले.
आपण दादांचा खूप आदर करीत आलो आहोत, त्यांच्या भावना बरोबर आहेत, त्या भावनांबरोबर आपणही आहोत, असे नमूद करीत खासदार जाधव यांनी दादांना आपल्यावर टिका टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार आहे, असे स्पष्ट केले. दादांनी या विषयात एवढे अॅग्रेसिव्ह होऊ नये, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis