
मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.)। झी मराठीवरील 'कमळी' आणि 'तारिणी' या मालिकांमधील प्रमुख नायिका केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजातील योग्य-अयोग्याची लढाई लढत आहेत. एका बाजूला कमळी स्वाभिमान, शिक्षण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला तारिणी सत्याचा शोध घेत न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करत आहे. दोघींचे मार्ग वेगळे असले, तरी त्यांचा उद्देश एकच आहे, अन्यायाला न झुकता योग्य गोष्टीसाठी लढत राहणे. येत्या भागांमध्ये या दोघींच्या मालिकेत आणि आयुष्यात नवी वळणं, नवी आव्हानं .येणार आहेत.
‘कमळी’ च्या आयुष्यात आता संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. रितेश आणि कमळी समोरासमोर येणार आहेत. रितशने दिलेला प्रस्ताव कमळी स्पष्ट शब्दांत नाकारते. तिच्या या निर्णयामुळे दोघांमध्ये अहंकार आणि विचारांची जोरदार टक्कर रंगणार आहे. कमळी कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करायला तयार नाही आणि हाच तिचा ठामपणा रितेशलाही आव्हान देणार आहे. याचदरम्यान, अनिका रितेशची साथ देत कमळीसमोर नव्या अडचणी निर्माण करण्याचा निर्धार करते. एकामागोमाग एक संकटं उभी राहत असताना कमळी त्यांचा सामना कसा करणार? तिचा निर्धार या नव्या डावांवर मात करेल का? की रितेश आणि अनिकाची युती कमळीच्या वाटचालीत मोठा अडथळा ठरणार?
'तारिणी' मालिकेत कथेला आता आणखी एक थरारक वळण मिळणार आहे. युवराजची सुटका होताच तो केदार आणि तारिणीवर त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करतो. त्याच्या सुटकेची बातमी लाईव्ह करण्याची जबाबदारी केदारवर आहे. मात्र, याचवेळी युवराजला एका अनोळखी व्यक्तीकडून नव्या डीलबाबत फोन येतो. या फोनमुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि गुलाबच्या मागे असलेल्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्याचा तो निर्णय घेतो. दुसरीकडे, घरातील पूजेदरम्यान तारिणीला काही नवे धागेदोरे मिळणार आहेत. या संकेतांमुळे तिला संशय येऊ लागलाय की, या संपूर्ण कटामागे घरातीलच कोणीतरी व्यक्ती आहे. सत्याच्या अधिक जवळ पोहोचत असताना तिच्यासमोर नवी संकटं उभी राहणार आहेत. आता या सगळ्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे? तारिणीचं संशयाचं वर्तुळ अखेर कुणावर जाऊन थांबणार? घरातील व्यक्तीवर संशय घेण्याइतके कोणते संकेत तारिणीला मिळालेत ?
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर