
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। खंडाळी (ता. मोहोळ) येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. या घोषणेचे वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
खंडाळी येथे आयोजित भगवान श्री विठ्ठल पादुका पालखी सोहळा-२०२६ तसेच जगद्गुरू श्री संत तुकोबाराय वाङ्मयीन विचार चिंतन नामजप सप्ताह कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे आणि लोकनेते सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारकरी, ग्रामस्थ आणि आयोजकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, खंडाळीचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसराच्या विकासालाही गती मिळेल.यावेळी मंदिर विकास, भाविकांसाठी मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाच्या विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड