


रायगड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। : पारंपरिक शेतीबरोबरच आंबा, काजूसारख्या फळपिकांची लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करावेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक फळबाग शेतीकडे वळल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील मौजे विन्हेरे येथे शेतकरी किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर 'मागेल त्याला काजू' योजनेअंतर्गत ०.२० हेक्टर क्षेत्रावर सीआरए तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काजू लागवडीचा शुभारंभ, तर मौजे नातोंडी येथे शेतकरी ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत ०.२५ हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचे उद्घाटन मंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, पंचायत समिती सभापती श्रीमती सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. खिडबिडे, श्रीमती म. माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकळे, तहसीलदार श्री. शितोळे तसेच कृषी व फलोत्पादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोगावले म्हणाले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती पडिक राहत असल्याचे दिसून येते. अशा जमिनीवर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांनी दीर्घकालीन उत्पन्नाची व्यवस्था उभी करावी. व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत आंबा घन लागवडीसाठी १०० झाडांपर्यंत सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत दिले जात आहे. तसेच 'मागेल त्याला काजू' योजनेअंतर्गतही अनुदानाची सुविधा उपलब्ध असून काजू हे कमी जोखमीचे आणि दीर्घकाळ उत्पन्न देणारे पीक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. कृषी व फलोत्पादन विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शनासह सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. फळबाग लागवड ही भविष्यातील शाश्वत शेतीची दिशा असून, त्यातून रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण विकासालाही गती मिळेल, असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)