
कोल्हापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)|कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहरात अनेक लोकहितोपयोगी प्रकल्प राबवले जात आहेत. ही विकासकामे पूर्णत्वास आली असून, त्याचे दि.०९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह,मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम.,श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत बहुमजली पार्किग हॉटेल गोकुळ येथील मल्टीलेव्हल कार पार्किंग, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसित करणे, रंकाळा तलाव येथे म्युझिकल फौंऊटेन आदी विकास कामांच उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर महायुती सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक प्रगती, पर्यटन वाढ आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रशासकीय पातळीवरील निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान केल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे. महायुती सरकार कोल्हापूरचा कायापालट करूनच जनतेला दिलासा देईल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त राजेंद्र भारूड उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar