
सोलापूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आळंदी परिसरात ८ व ९ ऑगस्ट रोजी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
पालखी सोहळा सुरळीत पार पडावा आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ ऑगस्ट रोजी पंढरपूरहून आळंदीत दाखल होणार आहे. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी आळंदी नगरप्रदक्षिणा आणि हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, संत तुकाराम महाराजांची पालखी ८ ऑगस्ट रोजी पिंपरी येथे मुक्कामी येणार असून, ९ ऑगस्ट रोजी देहूकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट रोजी पुणे, मोशी, मरकळ चौक आणि चाकण चौक येथून आळंदी शहरात जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ९ ऑगस्ट रोजी नगरप्रदक्षिणा मार्गावरील चाकण चौक, वडगाव चौक आणि केळगाव चौक येथून वाहतुकीवर निर्बंध असतील. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे. याशिवाय, चाकणकडून येणाऱ्या अवजड वाहनांना आळंदी फाटा येथून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पालखी मार्गावरील प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड