
दिसपुर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। आसाममधील शोणितपूर जिल्ह्यात बालीपारा जवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग-१५ वर टुबुकीझार येथील मीट सप्लाय परिसरात हा अपघात झाला. भरधाव ट्रक आणि ईको वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची ओळख संजय मेष, लाटुमनी (पापू) बोरा, नयन स्वर्गियारी, प्रांजल बनिया आणि हरबिंद (गोविंद) हाजोवारी अशी झाली आहे. सर्व मृत युवक ओहनी पथार बटाबारी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने येत होती. त्याचवेळी भरधाव ट्रकने ईको वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ईको वाहन रस्त्यालगतच्या खोल दरीत जाऊन कोसळले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त ईको वाहनातून दारूच्या अनेक बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, या बाटल्यांचा अपघाताशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. भरधाव वेग, वाहनांची स्थिती तसेच अपघाताशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule