चंद्रपूर : राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन, ९६ वर्षांची परंपरा आजही अखंड
चंद्रपूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी यंदाही पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. जोरगेवार कुटुंबीयांकडून गेल्या ९६ वर्षांपासून अखंडपणे गणेशोत्सवाची परंपरा जपली जात असून, त्यांच्या आजोबांनी
चंद्रपूर : राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन, ९६ वर्षांची परंपरा आजही अखंड..


चंद्रपूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी यंदाही पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. जोरगेवार कुटुंबीयांकडून गेल्या ९६ वर्षांपासून अखंडपणे गणेशोत्सवाची परंपरा जपली जात असून, त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचा वारसा आता तिसरी पिढी पुढे नेत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तब्बल ९६ वर्षांच्या कौटुंबिक परंपरेचा आणि संस्कारांचा साक्षीदार ठरला आहे.

जोरगेवार कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सवाची सुरुवात त्यांच्या आजोबांनी १९३१ मध्ये केली होती. भक्ती, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोप्याच्या भावनेतून सुरू झालेली ही परंपरा काळाच्या ओघात अधिक समृद्ध होत गेली. पुढील पिढ्यांनीही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने जपली असून, आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या कुटुंबीयांकडून या परंपरेला पुढे नेण्यात येत आहे. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने राजमाता निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून कुटुंबीयांनी बाप्पाचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले.

९६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या गणेशोत्सवाच्या परंपरेत अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, मात्र गणरायावरील श्रद्धा आणि कुटुंबीयांनी जपलेली ही परंपरा कायम राहिली. त्यामुळे या गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच कौटुंबिक भावबंध आणि संस्कारांचेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घरगुती गणेशोत्सव हा केवळ पूजा आणि उत्सवापुरता मर्यादित न राहता कुटुंबाला एकत्र आणणारा संस्कारांचा उत्सव आहे. ज्येष्ठांनी जपलेल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यातून आपल्या संस्कृतीशी नाते अधिक दृढ करणे, हीच या ९६ वर्षांच्या गणेशोत्सवाची विशेषता आहे.

समाजातील दुर्जन शक्तींचा नाश व्हावा आणि जनतेच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर व्हावीत. प्रत्येक कुटुंबात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदावी. समाजात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तिचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर व्हावे, तसेच प्रत्येक व्यक्तीला नव्या आशेने आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची शक्ती मिळावी. अशी मंगलमय कामना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande