

* जातीची प्रतिष्ठा कमी होऊन देऊ नका* प्रकृतीमुळे थेट मुंबईला जाण्याची शक्यता
बीड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : फडणवीस यांनी मला गोळ्या घालायचे षडयंत्र रचले आहे, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तसेच, मी माझ्या कुटुंबाला सांगून आलोय स्वाभिमानाने जगा. पोराला सांगितले धाडसाने पुढे चला. मी समाजासाठी गेलो तर पुढे गाडा चालवं. जातीची प्रतिष्ठा कमी होऊन देऊ नका. दरम्यान उपोषणाचा त्रास होतोय, उपोषणात दौरा चांगला नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपालीपर्यंत जायचा तर माणूस खाऊन पिऊन असला पाहिजे. मी पोलिसांना सांगून पाटोद्याहून थेट मुंबईला जाईल, असे सुतोवाच जरांगे यांनी केले.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे यांचा मंगळवारी रात्रीचा मुक्काम बीडमध्ये होता. मनोज जरांगे यांची रात्री दोन वाजता बीडच्या पाटोदा चौकात सभा झाली. या सभेला मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली होती.
देवेंद्र फडणवीस तोडीस तोड डाव टाकतोय. मी त्याला तीन वर्ष हरवले आहे. पेन ड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही केले तरी पेन ड्राइव्हमध्ये नोंदी आहेत. आपल्या हातात आता चेक आहे. आपण कधीही बँकेत टाकू. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
जरांगेंनी उपस्थित मराठा बांधवांना आवाहन केले की, तुम्ही पाटोद्यातच थांबा मी एकटा मुंबईला जातो. कोणत्या मार्गाने जाणार हे पोलिसांना सांगतो. मला वाटलं फक्त पाच गाड्या माझ्यासोबत असतील. पण तुम्ही एवढे जण सोबत याल वाटलं नव्हतं. तुम्ही पाटोद्यातच थांबा. मी एकटा पुढे जातो. त्यांच्या वक्तव्यानंतर सभेमधील मराठा बांधवांनी आम्ही देखील खोपोलीपर्यंत येणार, असे मोठ्याने सांगितले. त्यावर जरांगेंनी मग तुम्ही जावा मी परत आंतरवाली सराटीत जातो, असे भावनिक साद घालत, आपल्यासोबत कोणी येऊ नका, असे म्हटले.
जरांगे म्हणाले, हे मी करतोय ते कोणासाठी करतो, माझ्या समाजासाठी करतोय. माझ्या लेकराबाळांसाठी काही करत नाही. समाजाच्या लेकरांच रक्त सांडलं नाही पाहिजे. मी येताना बायकोला सांगितलं आहे की, मला काही झालं तर समाजाला काही बोलू नको, कुणाकडून काही घेऊ नको, भीक मागून खा पण समाजाला बोल लावू नको.
मी सलाईन घेतले की सरकार बिनधास्त होते. सलाईन सोडली की टेन्शनमध्ये येते. ज्याला कोणी वस्ताद नाही. ज्याला कोणी बाप नाही त्याचा बाप आहे मी. चांगल्या चांगल्यांची जिरवली आहे. माझ्या समाजाच्या लेकराबाळांसाठी लढताना शरीर थकले. तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतले आहे. आपण कधीच कोणाला हतबल होऊ देऊ शकत नाही. सरकारला वाटते मी त्यांना शरण यावे पण मागणी सोडून देऊ? सरकारपेक्षा माझा बाप मोठा आहे. माझा समाज माझा बाप आहे. माझा समाज कोणतेही सरकार पडू शकतो. दुसरे आणू शकतो, असं भावनिक विधान जरांगेंनी केलं.
-----
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis